Saturday, June 27, 2009

Saturday, June 27, 2009

विदार्भाच्या हजारो शेतकरी विधावांचा वेदना -हजारो कलावतींच्या पुनर्वसनासाठी वी.ज.स .घेणार पुढाकार-सकाळ वृत्तसेवा

हजारो कलावतींच्या पुनर्वसनासाठी घेणार पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
http://beta.esakal.com/2009/06/27201928/vidarbha-yavatmal-farmers-wid.html
Saturday, June 27th, 2009 AT 8:06 PM
यवतमाळ - मागील पाच वर्षांत पश्‍चिम विदर्भात सहा हजारांवर शेतकरी आत्महत्या झाल्या. परंतु, सरकारी अधिकाऱ्यांनी मदतीला पात्र असूनही आत्महत्या कमी झाल्या, हे दाखविण्यासाठी त्यांना मदतीपासून वंचित ठेवले. जळका येथील एक शेतकरी विधवा कलावती बांदूरकर हिला 25 लाखांची मदत देऊन ही समस्या सुटणार नाही. विदर्भातील हजारो कलावतींसारख्या सर्वच शेतकरी विधवांचे पुनर्वसन करण्याचा एकमुखी निर्धार बोथबोडन येथे शेतकरी विधवांच्या पुनर्वसन कार्यक्रमात गुरुवारी (ता. 25) करण्यात आला.
दिल्लीच्या अमित जोसेफ यांच्या बिजनेस कम्युनिटी फाउंडेशनतर्फे बोथबोडन येथील बेबी विनोद राठोड, बेबी चरण जाधव, शोभा नामदेव पवार, शांताबाई चंद्रभान वरणकार, यमुना नंदलाल राठोड, शेवीबाई रूपा राठोड, शांताबाई शंकर वाघमारे, संपत्तीबाई तारासिंग राठोड, अनसूया रामचंद्र देवकर, विमल विष्णू चव्हाण, फुलीबाई हरी जाधव, अनिता मनोज राठोड, अनसूया सुखदेव राठोड, कमलबाई गणपत रिंगणे, नाजीबाई देवा राठोड या 15 शेतकरी विधवांना प्रत्येकी 500 रुपये महिन्याचे पहिल्या हप्त्याचे वाटप बोथबोडन येथील सरपंच बाळू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, समितीचे सचिव मोहन जाधव, झरी तालुकाप्रमुख सुरेश बोलेनवार, भाऊराव आडे, कवडू शेळके, हरिचंद चव्हाण, बाबूलाल राठोड उपस्थित होते. विदर्भ जनआंदोलन समितीने अनेक स्वयंसेवी संस्थाशी संपर्क करून शेकडो विधवांना आर्थिक मदत सुरू केली आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बोथबोडन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोथबोडनचे सरपंच बाळू चव्हाण यांनी बोथबोडनला कॉंग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी भेट देऊनसुद्घा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीचा प्रश्‍न अजूनही सुटला नसल्याचे सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांचा विचार करीत असताना सध्या बोथबोडनसारख्या आपत्तीग्रस्त खेड्यात शेकडो निराधार, विधवा, वृद्ध व परित्यक्ता महिला असून, त्यांच्यासाठीसुद्घा आर्थिक मदतीच्या कार्यक्रमाची योजना अत्यंत आवश्‍यक आहे. हा प्रश्‍नही मार्गी लावण्याचे आवाहन सरपंच बाळू चव्हाण यांनी केले. सरकारने सर्व शेतकरी व शेतमजुरांच्या विधवांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्याचे आदेश देऊनही अजून पश्‍चिम विदर्भातील हजारो विधवांना अंत्योदय योजना लागू करण्यात आली नसल्याची खंत यावेळी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. समाजातील या निराधार व उपेक्षितांसाठी विदर्भ जनआंदोलन समिती लवकरच जनआंदोलन सुरू करणार असल्याची माहिती समितीचे सचिव मोहन जाधव यांनी दिली.
=======================================================

No comments: