Tuesday, June 19, 2012

कोळशावर आधारित १३२ नवे वीज प्रकल्प--लोकमत



कोळशावर आधारित १३२ नवे वीज प्रकल्प--लोकमत


सर्वाधिक ५८ चंद्रपुरात, यवतमाळ-अमरावतीत १४ प्रकल्प

यवतमाळ। दि.१९ (प्रतिनिधी)

कोळशावर आधारित १३२ नवे विद्युत प्रकल्प विदर्भात येत आहेत. त्यापैकी बहुतांश प्रकल्पांना केंद्र शासनाने मंजुरी दिली. काही मंजुरीच्या वाटेवर आहेत.विदर्भाच्या जनतेनी या १३२ विद्युत प्रकल्पचा विरोध करावा असे आवाहन   विदर्भ जनआंदोलन समितीचे प्रमुख किशोर तिवारी यांनी केले.
या प्रकल्पातून विदर्भात ८६ हजार ४६0 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी १ लाख एकर जमीन अािण दररोज ३६ हजार क्युबिक मीटर पाणी लागणार आहे. या पाण्यामुळे सहा लाख हेक्टर सिंचन क्षमता कमी होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांमध्ये दररोज १८ लाख टन कोळसा जाळला जाणार आहे.
प्रस्तावित १३२ वीज प्रकल्पांपैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात २८ प्रकल्प होत असून त्याची क्षमता १७ हजार मेगावॅट आहे. सर्वाधिक ५८प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात येत असून त्याची क्षमता २८हजार मेगावॅट आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २२ हजार मेगावॅट क्षमतेचे १६ तर अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात १४ हजार मेगावॅट क्षमतेचे २0 प्रकल्प येत आहे. वर्धा जिल्ह्यात ३२00 मेगावॅटचे सात तर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात कोळसा व पाणी मिळविण्यासाठी दोन हजार मेगावॅटचे तीन प्रकल्प येत आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे खापरखेडा, कोराडी व चंद्रपूरमध्ये तीन हजार मेगावॅटचे नवे प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पांमधून पुन्हा मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावल्या जाणार असून सिंचनासाठी असलेले पाणी ओढले जाणार आहे. त्यामुळे सहा लाख हेक्टर सिंचन क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता आहे.
विदर्भ जनआंदोलन समितीचे आवाहन
वर्धा येथील काँग्रेस खासदाराचे लॅनको प्रकल्प पुन्हा जनसुनावणीसाठी आणले आहे.उद्या २0जूनला वर्धेमध्ये ही जनसुनावणी होत असून ती हाणून पाडण्याचे आवाहन विदर्भ जनआंदोलन समितीचे प्रमुख किशोर तिवारी यांनी केले

No comments: